अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात वारंवार बदल; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम   

पुणे : यंदा दहावीचा निकाल वेळेवर जाहीर करून राज्य मंडळाने सकारात्मक सुरुवात केली आहे. मात्र त्यानंतर सुरू झालेली अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया मात्र नियोजनशून्य आणि गोंधळाची ठरत आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अकार्यक्षम कारभारामुळे आणि वेळापत्रकातील वारंवार बदलांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य सध्या अनिश्चिततेत अडकले आहे.
 
अकरावी प्रवेशासाठी जाहीर करण्यात आलेल्या शून्य फेरीच्या गुणवत्तायादीचे वेळापत्रक पुन्हा एकदा बदलण्यात आले आहे. यापूर्वी १० जून रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार होती. मात्र, नवीन सुधारित वेळापत्रकानुसार आता ही यादी तब्बल १६ दिवसांनी म्हणजे २६ जून रोजी प्रसिद्ध होणार आहे. शून्य फेरीची गुणवत्तायादी ११ जून रोजी जाहीर होईल, आणि १२ ते १४ जूनदरम्यान त्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
 
याशिवाय, इनहाऊस व अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशाच्या तारखांमध्येही दोन वेळा फेरबदल करण्यात आले आहेत. तसेच, १७ जून रोजी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या शाळांची आणि अर्जांची तपासणी होणार आहे. मात्र, त्या आधीचा मोठा कालावधी कोणत्या कारणासाठी राखून ठेवण्यात आला आहे, याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे.
 
पहिल्या फेरीत प्रवेश घेण्यासाठी २७ जून ते ३ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार असून, दुसर्‍या फेरीसाठी रिक्त जागांची यादी ५ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे पहिल्या यादीलाच जवळपास संपूर्ण जून महिना खर्ची पडणार आहे.या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, भाग-१ भरलेले असूनही भाग-२ न भरलेले सुमारे ७५ हजार विद्यार्थी अद्याप प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकलेले नाहीत. संचालकालयाने मुदतवाढ दिल्यानंतरही केवळ ९ हजार विद्यार्थ्यांनीच भाग-२ भरला असून, एकूण अर्जदारांची संख्या ११ लाख ३८ हजारांवर पोहोचली आहे.
 
अशा परिस्थितीत, वेळापत्रकातील वारंवार बदल, माहितीतील अपूर्णता आणि नियोजनाचा अभाव यामुळे प्रवेश प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आली  आहे. तसेच गुणवत्ताधारित प्रवेश व्यवस्थेच्या उद्दिष्टालाच बाधा पोहोचते की काय, अशी चिंता पालक व विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
 

Related Articles